मुंबई | वृत्तसंस्था
दिग्गज अभिनेता आमीर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. या संवादात राज्याचा विकास, शेती, पाणी प्रश्न, राजकारणातील आदर्शवाद अशा विविध मुद्द्यांवर आमीर खान यांनी फडणवीस यांना बोलते केले. दैनिक लोकमततर्फे आयोजित या मुलाखतीत फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत आणि विचारांबाबत स्पष्टपणे मते मांडली.
मुलाखतीदरम्यान आमीर खान यांनी फडणवीस यांना विचारले की, तरुणपणी प्रत्येकाच्या मनात आदर्शवाद असतो आणि समाजात बदल घडवण्याची स्वप्ने असतात. मात्र ३५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात काम करताना तुमच्या आयुष्यात तो आदर्शवाद कितपत टिकून राहिला? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, आयुष्याच्या प्रवासात परिस्थितीनुसार बदल स्वीकारावे लागतात. काळानुसार वास्तव समजत जाते आणि त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. मात्र आपल्या मनातील आदर्शवाद कधीही मरू देता कामा नये.
“माझ्या आयुष्यात मी काही वैयक्तिक नियम ठरवले आहेत आणि त्यानुसारच जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. राजकारणात काम करताना प्रॅक्टिकल राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण लोकशाहीत निवडून आल्याशिवाय आपण अपेक्षित बदल घडवू शकत नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, “इतिहासात मागे वळून पाहताना मला जाणवते की ज्या विचारांसह मी राजकारणात आलो होतो, त्या विचारांनुसार १०० टक्के जगणे कधी कधी शक्य झाले नाही. अनेक वेळा तडजोड करावी लागली. मात्र माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी मी कधीच माझ्या विचारांशी तडजोड केलेली नाही आणि भविष्यातही करणार नाही.”
मुलाखतीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले. ग्रामीण भागात पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करून लोकांना बदल घडवण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल त्यांनी आमीर खान यांच्या कार्याची प्रशंसा केली.