ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात स्वयंपाक गॅसचा तुटवडा; नागरिक रांगेत, हॉटेल्स चुलीवर उभ्या

मुंबई : वृत्तसंस्था

इराण-इस्रायल युद्धाच्या थेट परिणामामुळे महाराष्ट्रात गॅस पुरवठ्यावर गंभीर तणाव निर्माण झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्व शहरांत स्वयंपाकासाठी गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. नागरिक गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगेत उभे राहत आहेत, तर हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे व लहान खाद्यव्यवसायिक व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक प्रमुख शहरांत गॅस पुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ग्राहकांनी ऑनलाइन व फोनद्वारे सिलिंडर बुकिंग केलेली असली तरी वेळेवर डिलिव्हरी होत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी नागरिक सकाळी एजन्सी उघडण्याआधीच रांगेत उभे राहतात. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध घातल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे व लहान खाद्यव्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी फक्त दोन-तीन दिवसांचा गॅसचा साठा होता, जो संपल्यामुळे स्वयंपाक चालवणे कठीण झाले आहे. परिणामी, काही हॉटेल्सनी लाकडी चुली किंवा कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक करून तात्पुरती व्यवस्था सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील महावीर चौकातील शिवगणेश हॉटेलसह अनेक हॉटेल्स उघड्यावर चुली पेटवून पदार्थ बनवत आहेत. हॉटेल मालक प्रवीण कुमार म्हणतात, “ही परिस्थिती अशीच राहिली तर हॉटेल बंद करावे लागेल.” पुण्यातील एका हॉटेल मालकाने सांगितले की व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातील अनेक लहान खानावळींनी चहा, नाश्ता आणि काही मर्यादित पदार्थ कोळशावर बनवण्यास सुरुवात केली आहे. परंतु ही पद्धत जास्त खर्चिक व वेळखाऊ आहे. काही हॉटेल्सनी तात्पुरते आपल्या मेन्यूतील काही पदार्थ बंद केले आहेत.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी पुन्हा पारंपरिक चुलींचा वापर सुरू केला आहे. यामुळे घरगुती स्वयंपाकासाठी लोकांवर अतिरिक्त मेहनत आणि खर्चाचा फटका बसत आहे. राज्यातील गॅस टंचाईची ही परिस्थिती नागरिक आणि व्यवसायिकांसाठी मोठा त्रासदायक प्रश्न ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!