ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘लालपरी’ला वेग देण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती !

मुंबई : प्रतिनिधी

राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी तब्बल १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली.

प्रवाशांना अखंडित आणि विनाअडथळा सेवा मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रताप सरनाईक म्हणाले की, नियमित कर्मचारी भरतीसाठीचा प्रस्ताव सध्या अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, नव्या बसेस ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्या डेपोमध्ये उभ्या न राहता तत्काळ रस्त्यावर धावणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईकरांसाठी ‘लक्झरी’ प्रवासाची सोय
मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष योजना आखली आहे. लवकरच मुंबईच्या ताफ्यात ३० स्लीपिंग कोच आणि १७० वातानुकूलित (व्हॉल्वो) बसेस समाविष्ट होणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसेस अधिक आरामदायी आणि सोयीस्कर ठरणार आहेत.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास
महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलतीनंतर आता एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेला मान देत हा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

शिस्तभंग कारवाईत पारदर्शकतेवर भर
कर्मचारी संघटनांच्या बैठकीत चालक-वाहकांच्या दैनंदिन अडचणींवरही चर्चा करण्यात आली. आगार स्तरावरील निर्णयप्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचे आणि शिस्तभंग कारवाईत न्याय्य पद्धती अवलंबण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विधानभवनात विशेष बैठकही पार पडली. या निर्णयांमुळे एसटी महामंडळाच्या सेवेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!