लातूर : वृत्तसंस्था
भाजपाने उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. गेल्या ४५ वर्षांत देशात बेरोजगारी उच्चांकी असून, ३० लाख पदे रिक्त ठेवली. शेती उत्पादनांवर जीएसटी लावली, ६०० शेतकरी शहीद झाले. अन् ते लहान मुलांसारखे ७० वर्षांवर तेच ते कितीदा बोलणार. तुम्ही १० वर्षात काय केले ते सांगा. ‘नौटंकी नहीं, सच्चाई चलेगी’, असा घणाघात करीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी- वाड्रा यांनी ‘अब की बार जनता की सरकार’ हा नारा शनिवारी येथे दिला.
काँग्रेस उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे आपल्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचार सभेत प्रियंका म्हणाल्या, टी. व्ही. आणि जाहिरातींमध्ये दिसते ते सत्य नाही, तुम्ही जे रोज जगता ते सत्य आहे. महागाई वाढली, शेतमालाला भाव नाही, महिला, दलित सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान जगभ्रमण करीत आहेत. भाजप सरकारने महाराष्ट्रात पक्षांतराचा पायंडा पाडला. करोडो रुपयांना आमदारांची खरेदी झाली. तुम्ही निवडून दिलेले सरकार पाडले. हे सरकार ६० टक्क्यांचे आहे, असे प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या