ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट – सिंदखेड रस्त्यावरील बोगद्यासाठी शेतकरी पुन्हा आक्रमक ;दोन दिवसात निर्णय घ्या,अन्यथा काम बंद पाडू : दिलीप सिद्धे

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट
ते सिंदखेड रस्त्यावरील बोगद्यासाठी
शहर आणि परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट नगरपालिकेलाही अडचण निर्माण
झाली असून पालिकेची पाईपलाईनच
पूल व रस्त्याखाली गेल्याने दुरुस्ती
व देखभालीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
याकडे कोणाचेही लक्ष नाही.ही बाब मंगळवारी निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन पाटील यांची भेट घेतली आणि
त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रत्यक्षात परिस्थिती पाहण्याची देखील विनंती केली.त्यानंतर त्यांनी कामाची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक बसलींगप्पा खेडगी, नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा
संघटक विक्रांत पिसे,धनाजी मोरे, राजेशव्हनमाळगी,राष्ट्रवादी शाखा प्रमुख सागर भिडे,बसवराज किरनळळी,सोमेश्वर किरनळळी,राजू भालके,कल्याणी पेंटर व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या अक्कलकोट ते सोलापूर काँक्रीट रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याअंतर्गत बायपास अक्कलकोट रस्त्याचे कामे सुरू आहे पण या रस्त्यावर प्रत्यक्षात
अक्कलकोट शहरातून बाहेर
पडल्यानंतर सिंदखेडकडे जाण्यासाठी बोगदा ठेवणे गरजेचे होते.यात अधिकाऱ्यांची चूक झाली आहे.त्याच ठिकाणाहून अक्कलकोट नगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील गेली आहे.ही पाईपलाईन आता पूर्णपणे रस्त्याच्या खाली गेली आहे.

पाइपलाइनच्या वर रस्ता साधारण वीस ते पंचवीस फूट आहे एखाद्या वेळी जर या पाईपलाईनचा काही प्रॉब्लेम झाला तर मात्र दुरुस्ती होऊ शकत नाही.त्यासाठी रस्ताच फोडवा लागेल, अशी परिस्थिती आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.वस्तूस्थिती म्हणजे याठिकाणी नागरिकांना येण्या-जाण्यासाठी
बोगदा ठेवून नगरपालिकेची पाईपलाईनची जागा देखील उघडी ठेवणे गरजेचे होते.
तसे न केल्याने गैरसोय होत आहे.वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतः तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी पुढाकार
घेत सर्व अधिकाऱ्यांना आणून ही परिस्थिती दाखवली. त्यावेळी मुख्याधिकारी पाटील यांनी ही परिस्थिती मान्य करत याबाबत ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग
विभागाशी संपर्क साधून बोलू,त्यांना
लेखी पत्र देऊ आणि यासंदर्भात तोडगा
काढू,वेळ न घालता तातडीने पावले उचलण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नगरसेवक बसलींगप्पा खेडगी यांनी सर्व्हे चुकीचा झाला असून यावर नगरपालिका योग्य ते पाठपुरावा
करेल आणि पाईपलाईन कशी सुरक्षित राहिल याकडे लक्ष देईल, आणि हे काम होई पर्यंत बंद करण्याचे पत्र देऊ, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.

वास्तविक पाहता सिंदखेडकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून शेकडो शेतकरी रोज ये-जा करतात तसेच या रस्त्यावरून मोट्याळ, सिंदखेड,कुरनूर या गावांनाही रस्ता जातो. केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा त्रास
सहन करावा लागत आहे.वेळोवेळी अधिकाऱ्यांनाही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

मध्यंतरी तीन महिने या ठिकाणचे काम बंद होते परंतु दोन दिवसांपासून हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे शेतकरी आक्रमक होत प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून देऊन या ठिकाणी बोगदा करावा,अन्यथा काम बंद पाडू असा इशारा दिला आहे.

★ दोन दिवसात निर्णय घ्या, अन्यथा काम बंद पाडू

शेतकरी आणि अक्कलकोट शहराच्यादृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. तरी जर हे काम होत नसेल तर काम बंद पडल्याशिवाय राहणार नाही. याबाबत दोन दिवसात निर्णय होऊन हे काम मार्गी लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल – दिलीप सिद्धे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!