ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हत्ती तलावाच्या संगीत कारंजासाठी आणखी पाच कोटींचा निधी मंजूर !

शहराच्या सौंदर्य वृद्धीसाठी आमदार कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहरात सध्या वाढत असलेल्या स्वामी भक्तांचा ओघ भविष्यात आणखी वाढावा आणि आलेले स्वामीभक्त या ठिकाणी राहून अक्कलकोट शहरातील नैसर्गिक आणि धार्मिक वैविध्य अनुभवावे यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ मंदिरा जवळ असलेल्या हत्ती तलावात आकर्षक विद्युत रोषणाईने युक्त संगीत कारंजा बसवण्यासाठी आणखी पाच कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हे काम सुरू होऊन हत्ती तलावाच्या म्हणजेच शहराच्या सौंदर्यात वाढ होणार आहे.

कोरोना काळाच्या नंतर अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ओघ हा दिवसेंदिवस अधिक होतो आहे.यापूर्वी अक्कलकोटला भाविक येणे आणि दर्शन घेणे आणि तासभर नंतर लगेच सोलापूरला परत जाणे असा त्यांचा प्रवास असायचा. मागील दोन वर्षांपासून अक्कलकोट शहरात राहण्यासाठी चांगले लॉजिंग, स्वच्छ व टाप टीप सकस आहार मिळणारे हॉटेल्स, शहराला चारही बाजूने जोडणारे राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते यामुळे भाविकांची अक्कलकोटला मुक्कामी राहणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.

त्याचा नेमका लाभ अक्कलकोटच्या व्यापाऱ्यांना आणि पर्यटनाच्या वृद्धीसाठी व्हावा याचा विचार करून आमदार कल्याणशेट्टी यांनी संस्थानकालीन ऐतिहासिक हत्ती तलावाचे नूतनीकरण आणि सौंदर्यकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला असून पहिल्या टप्प्यात तिथल्या बांधकामासाठी रुपये पाच कोटीचा निधी यापूर्वी मिळाला आहे. त्याच अनुषंगाने पुढील काम हे हत्ती तलावामध्ये कारंजा बसवणे हे असणार आहे आणि त्यासाठी सुद्धा लागणाऱ्या पाच कोटींच्या निधीच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.यासाठी एकूण १० कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे.सदर कारंजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी लागणारे पाणी हे थेट कारंजामध्ये न येता ते पाणी शुद्धीकरण करून कारंजामध्ये घेतले जाणार आहे जेणेकरून कारंजा नियमितपणे विनाअडथळा सुरू राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. सदर कारंजे आकर्षक विद्युत रोषणाई आणि संगीतमय असणार आहे. सदर यंत्रणा ही वाढीव यंत्रणेच्या स्वरूपात असल्याने भविष्यात आणखी एखादी लाईन कारंजा करण्यासाठीची टाकावयाचे झाल्यास कमी निधीमध्ये आणखी एक कारंजाचे लाईन सुरु करता येऊ शकते.यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा नियोजन अधिकारी पवार यांचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले. यामुळे शहरातील नागरिक आणि स्वामी भक्तामध्ये समाधानाचे वातावरण
निर्माण झाले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group