मुंबई : वृत्तसंस्था
जगभरात नव्या वर्षाचा जल्लोष सुरु असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्षानिमित्त ठाण्यात रक्तदान केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहभागी होत मध्यरात्री १२ वाजता रक्तदान करुन नववर्षाचे स्वागत केले. तसेच ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेली 29 वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे. काही उपक्रम सुरू होतात पण कालांतराने बंद होतात. मात्र ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या उपक्रम तसेच अखंडितपणे सुरू आहे. मी स्वतः 31 डिसेंबरला रक्तदान करतो. एक आगळवेगळा रक्तदान शिबिर महा रक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो. रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झालेला नाही”, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
”नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली 29 वर्षे आपण करत आहे. दिघे साहेबांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या उपक्रमाची सुरुवात पहिली केली. आनंद दिघे साहेबांनी जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवले. या रक्तदान शिबिरामध्ये कुणालाही बोलवावे लागत नाही. कोणाला निमंत्रण पाठवावा लागत नाही, आपोआप सगळे लोक या ठिकाणी येतात शेकडो लोक येतात आणि रक्तदान करतात याचे वैशिष्ट्य आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.