सोलापूर,दि.१३ : गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मंगळवारी सायंकाळी अवकाळीने झोडपून काढले.वीजांच्या कडकडाटासह वादळी वार्यामुळे सोलापूर शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली.अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याचे वृत्त हाती येत आहे.

या अवकाळीमुळे सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी द्राक्ष, लिंबू, आंबा, केळी, डाळिंब बागांना मात्र मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात अजून ४० टक्के शेतकर्यांच्या गहू व ज्वारीच्या राशी शिल्लक होत्या. ज्वारीची कणसे काढून शेतात टाकण्यात आली होती.तर गहूही पूर्णपणे वाळल्यामुळे कापणीला आला होता. परंतु मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी वार्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला.त्यामुळे गहू,ज्वारी तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले.

हा पाऊस पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तसेच माढा तालुक्यात शेती पिकांसह फळबागांचेही नुकसान केले आहे.
सोलापूर शहरात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. वादळी वारा सुटल्याने शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
वार्याचा वेग प्रचंड असल्याने काही जणांच्या घरावर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्याही उडून रस्त्यावर पडल्या होत्या. वादळी वार्यामुळे अनेक भागातील लाईटदेखील गेली होती.






