मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील सरकार विरोधात लढाई लढत आहे. मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. या निमित्त ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, फडणवीस यांनी आचारसंहितेपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील, देवेंद्र फडणवीस यांची दडपशाही सुरू राहिली तर आधी केवळ दोन कोटी मराठा एकत्र आले होते. आता हाक दिल्यास चार कोटी मराठा एकत्र येतील, आणि त्यांना पाणी पाजतील अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो. मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. पण तुमच्या नेत्यानेच टांगा पलटी केल्यावर काय करणार? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. गोरगरीब मराठ्यांची मुले देखील मोठी झाली पाहिजे, यासाठी मी लढत आहे. तुम्हाला जाती पेक्षा नेता महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न करत जर तुम्हाला जातीपेक्षा तुमचा नेता मोठा असेल तर जा तिकडे, मराठ्यांकडे येऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हा सत्ता आणि मराठा यांच्यामधील काटा आहे. तो काटा दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे पाटीलला दूर करा, असे धोरण सरकारच्या वतीने आखले गेले असल्याचे ते म्हणाले. मात्र, मला मला जेलमध्ये टाकले तर मी जेलमधील मराठ्यांना देखील आरक्षण शिकवेल. मुस्लिम, धनगर समाजातील लोकांना देखील मदतीला घेईल. मात्र, माझी मान कापली तरी आता ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मला कोणतेही पद नको आहे, मी आई – बापाला देखील बाजूला केले असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.