---Advertisement---

डिसले गुरुजींचे प्रकरण आणि प्रशासनाची आडकाठी ! जरूर वाचा… रोखठोक !

Follow Us:
---Advertisement---

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेत संबंधित संस्थाचालकांच्या घरातील व्यक्तींच्या नियुक्त्या असतात जे फक्त महिना पगार उचलण्यापूरतेच शाळेत सही करण्यासाठी येतात त्यांच्यावर कधी कारवाई झाली?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत जिथल्या संस्थाचालकांच्या निवडणुकीसाठी आणि वाढदिवसासाठी शिक्षकांच्या पगारीतून पैसे कपात केले जातात अशा संस्थाचालकांवर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेतल्या शिक्षकांचा वापर शिकवण्याव्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठीच जास्त केला जातो अशा व्यक्तींवर कधी कारवाई झाली ?

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेतले शिपाई शाळा सोडून संस्था चालकांच्या घरची धुनी भांडी करण्यासाठी वा शेतातील कामावर असतात. त्यांच्यावर कधी कारवाई झाली ?

असे कित्येक शिक्षक आहेत ज्यांना झूम मिटिंगद्वारे लेक्चर घेता येत नसल्याने लॉक डाऊन काळात त्यांनी ऑनलाइन शिकवलेच नाही. मग अशा शिक्षकांवर कधी कारवाई झाली ?

भारतात असे कितीतरी शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक वाचून दाखवण्यापालिकडचे शिक्षण देऊ शकत नाहीत. वर्गात जसे काही विद्यार्थी हुशार तर काही ढ असतात तसेच आपल्या देशातही काही शिक्षक हुशार तर काही ढ आहेत मग अशा ‘ढ’ शिक्षकांवर कधी कारवाई झाली ?

ज्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी जागतिक पातळीवर शाब्बासकी मिळवली त्यांच्या तीन वर्षाच्या कामात अनियमितता आहे असा ठपका ठेऊन त्यांना पी.एच.डी करिता अमेरिकेला जाण्यासाठी रजा मंजूर न होणे दुर्दैवी वाटते. जागतिक सन्मान मिळवणाऱ्या शिक्षकाच्या डोळ्यात जर इथली व्यवस्था पाणी आणणार असेल तर अशा व्यवस्थेला काय म्हणावे ?

दुःख याचेच जास्त वाटते की डिसले गुरुजींना अमेरिकेने संशोधनासाठी स्कॉलरशिप दिली मग तशी स्कॉलरशिप त्यांना आपल्या भारतातच का नाही दिली गेली ? शिक्षकांसाठी पण तशी एखादी स्कॉलरशिप आपल्या देशात का नाही ? बाहेरच्या कुणी आपल्यावर मोहर उमटवल्याशिवाय त्यांचे कौतुक करायचेच नसते का ?

दिसले गुरुजींचे फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला जाण्याने फक्त एका शाळेला किंवा तालुक्याला नव्हे संपूर्ण देशासह जगाला त्यांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. शिक्षक म्हणून प्रशासन पातळीवर काही त्रुटी असतीलही कदाचित पण माननीय शिक्षण विभागाने डिसले गुरुजींच्या प्रस्तावाचा धोरणात्मक विचार करायला हवा असे वाटते.

नियमानुसार काटेकोर चालायचे म्हणले तर चतुर्थ श्रेणी कामगारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, सह सचिवापासून मुख्य सचिवापर्यंत, पोलिस शिपायापासून महासंचालकापर्यंत आणि सरपंचापासून मुख्यमंत्र्यांमार्गे पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचीच कधीतरी कुठेतरी कर्तव्यात कसूर होतेच पण त्यातूनही नियम बाजूला सारून ते मार्ग काढतात; नव्हे तो काढवाच लागतो तसंच ग्लोबल टिचर अवॉर्ड विनर रणजितसिंह डिसले गुरुजींना देखील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. अशा हरहुन्नरी, हुशार, विद्वान, सात कोट रुपये जिंकूनही नोकरी करण्याची इच्छा दाखवणाऱ्या टेक्नॉलॉजीप्रिय शिक्षकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे. त्यांना जपलं पाहिजे, त्यांच्या विद्वत्तेचा आदर झाला पाहिजे एवढंच.

– विशाल गरड
२२ जानेवारी २०२२

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!