ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…आता बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार प्रतिउत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठे दावे केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिले नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!