पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारवर नेहमीच शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे आरोप करीत असतांना आता पुन्हा एकदा खा.सुळे यांनी महायुती सरकारला डिवचले आहे. मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो. आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी महायुती सरकारवरही अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्या दिंडोरी येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या.
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री नरहरी झिरवळ आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात भाषण दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ यांच्यां समोरच सुप्रिया सुळे यांची सरकारवर सडकून टीका केली.
मी रामकृष्ण हरी वाली आहे. फक्त माळ घालत नाही. कारण कधी कधी मटण खाते, खरे बोलते. मी काही त्यांच्यासारखे खोटे बोलत नाही. माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला. आमचे आई-वडील खातात, सासू-सासरे खातात, नवरा खातो, असेही त्या म्हणाल्या. आम्ही आमच्या पैशांनी खातो. दुसऱ्यांचे आपल्याकडे उधार नाही. आपण कुणाला मिंधे नाहीत.
एकदा कुठेतरी जेवायला गेले असता, तिथे मटण खाल्ले होते. तेवढेच व्हायरल केले. खाल्ले तर काही पाप केले का? खायचा मोह होतो म्हणून अजून माळ घातली नाही. जे करायचे डंके की चोट पे, दिल खोल के करो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारच्या कारभारावर टीका केली. “मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, असा आरोप सुळे यांनी केला. मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने मी मागणेच बंद केले आहे. दहा वेळा आपण वेळ मागतो, पण वेळ देत नाहीत. याचा अर्थ काय, त्यांना वेळ द्यायचा नाही. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो. मी ठरवले आहे, इथे काम करत नाही ना, माझी कामे दिल्लीत होतात” असे सांगत त्यांनी अमित शहा यांचे जाहीर आभारही मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केले नाही, असेही त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. “या योजनेतून 25 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, झिरवाळ साहेब आपण ताकदीने याचा विरोध करायला हवा. 4 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हजारो पुरुषांनी एवढे फॉर्म भरले कसे?” असा सवालही सुळे यांनी केला. लाडक्या बहीण योजनेची संपूर्ण चौकशी करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.