मुंबई : महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला होती मात्र या अर्थसंर्थ संकल्पातून तसं दिसलं नाही आणि तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय अर्थसंर्थ संकल्पावर बोलताना केली आहे. दरम्यान या अर्थ संकल्पात डिजिटल कार्यक्रमाच्या घोषणा जास्त करण्यात आल्या. तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत असते परंतु हा अर्थसंकल्प तंत्रज्ञानाच्या आधारावर सादर होत असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
पंतप्रधान मोदीजींनी दिलेल्या आश्वासनांपैकी अनेक गोष्टी या केवळ जुमलेबाजी होत्या. २०१४ साली वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन मोदीजींनी दिले होते. मात्र आजच्या बजेटमध्ये तीन वर्षांमध्ये ६० लाख रोजगार उपलब्ध करू हा नवीन जुमला फेकण्यात आला आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. pic.twitter.com/qeFLrZDVrT
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 1, 2022
नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं आश्वासन दिले होते. मात्र आजच्या अर्थसंकल्पात तीन वर्षात ६० लाख लोकांना रोजगार देण्याचे सांगण्यात आले. म्हणजे मोदींची ती जुमलेबाजी होती का ? २०२२ पर्यंत प्रत्येक माणसाचा हक्काचा कर देशात होईल असेही मोदी म्हणाले होते. म्हणजे ती पण जुमलेबाजी होती का ? असे अनेक सवालही नवाब मलिक यांनी या वेळी उपस्थित केले आहेत.
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे आश्वासन देण्यात आले होते आणि आता शेतकर्यां चे उत्पन्न वाढविण्यासाठी काम करु सांगत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. देशातील सर्वात विश्वासार्हता असलेली कंपनी एलआयसी असून तिचा आयपीओ काढून विकण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे. म्हणजे संपत्ती विकून देश चालवायचा हा मोदींचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे, असाही टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. एकंदरीत या अर्थसंकल्पातून कुठल्याच वर्गाला दिलासा देता आला नसल्याने जनतेमध्ये निराशा आहे असेही नवाब मलिक म्हणाले.






