औरंगाबाद : बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळं औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहन अडकली आहेत. दरम्यान, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
दरम्यान, दरड कोसळल्याने धुळे- औरंगाबाद- सोलापूर महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी इतर मार्गाने प्रवास करावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे. औरंगाबादला जाण्यासाठी चाळीसगाव मार्गे प्रवास करावा. तर, पुण्याहून औरंगाबादला यायचे असेल तर जळगावकडून यावे लागेल. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती.