ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“इराण–इस्त्रायल तणावाचा व्यापारावर फटका; निर्यात ठप्प, देशात अंड्यांचे दर घसरले”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक व्यापारावरही दिसू लागला आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे सागरी मार्गांवरील वाहतूक आणि व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांमधील आयात-निर्यात व्यवहार ठप्प झाल्याने भारतातून आखाती देशांना होणारी निर्यातही थांबली आहे.

या परिस्थितीचा परिणाम देशातील अंड्यांच्या बाजारावरही झाला आहे. निर्यात बंद झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढला असून दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात सात रुपयांना मिळणारे अंडे पाच रुपयांपर्यंत घसरले असून किंमतीत सुमारे दोन रुपयांची घट झाली आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अंड्यांची निर्यात होत असते. मात्र युद्धजन्य तणावामुळे सागरी मार्गांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे मालाची वाहतूक थांबली असून निर्यातदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निर्यात थांबल्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दर घसरले असून याचा काही प्रमाणात फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत आहे. कमी दरामुळे अंड्यांची मागणी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या या तणावाचा परिणाम पुढील काळात इतर कृषी व खाद्यपदार्थांच्या बाजारावरही होऊ शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्यापारी आणि उत्पादक परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!