मुंबई : वृत्तसंस्था
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला कुणीही संपर्क साधला नाही तसेच एखाद्या पक्षात जाण्यासाठी मीसुद्धा कोणाशी संपर्क केला नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी १७-१८ वर्षे मंत्रीपदावर राहिलो आहे. त्यामुळे मला मंत्रीपदाची प्रलोभने दिली जाऊ शकत नाहीत. माझ्याबाबत येत असलेल्या बातम्या पेरलेल्या आहेत. असे असले तरी माध्यमांबाबत माझी कोणतीही तक्रार अथवा राग नाही. कारण त्यांच्यामुळेच आमच्यासारख्यांना प्रसिद्धी मिळते, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.
जयंत पाटील लवकरच भाजपत प्रवेश करतील, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, मला कुणीही संपर्क केला नाही, मीही कोणाशी संपर्क केला नाही. त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी अनेक महिने दिल्लीला गेलेलोच नाही.. त्यामुळे माझी कोणाशी भेट होणे अशक्य आहे. मी १७-१८ वर्षे मंत्रीपदावर राहिलो आहे. त्यामुळे मला त्याबाबत कोणी प्रलोभने देऊ शकत नाही, अशी भूमिका मांडली. त्यांनी प्रसारमाध्यमाविषयी माझ्या मनात राग नाही. माध्यमांमुळेच आम्हाला प्रसिद्धी मिळत आहे, असेही ते म्हणाले.