ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जॉनी रावत यांच्या विनोदाने अक्कलकोटमध्ये हास्याचे फवारे

विवेकानंद प्रतिष्ठान व्याख्यानमाला पुष्प चौथे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

हसण्याने ईश्वराची प्रार्थना होते तर हसवणाऱ्यांसाठी ईश्वर प्रार्थना करतो असे सांगून तब्बल अडीच तास हास्य सम्राट जॉनी रावत यांनी अक्कलकोटकरांना खळखळून हसविले. सोबतच्या दोन कलाकारांनी देखील वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून रसिकांना अक्षर:शा जागेवर खिळवून ठेवले.निमित्त होते गणेशोत्सवानिमित्त आयोजित विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेचे.चौथे पुष्प ‘हसवा हसवी’ या कार्यक्रमाने गुंफले गेले.

प्रारंभी श्री गणरायाला वंदन करून श्री गणरायाचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.व्यासपीठावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे,अभिजीत लोके, श्रीशैल रोडगे,सायबणा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात जॉनी रावत यांनी सादर केलेल्या दादा कोंडके आणि निळू फुले यांच्यामधील संवादाने सभागृहात हास्याचे फवारे उडाले.माणूस जिथे उभा राहतो. तिथे विनोद तयार होतो असे सांगत जॉनी रावत यांनी महाराष्ट्रात फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आलेले अनुभव कथन करत विनोदी किस्से सांगितले.कोरोना काळात काही अनोखे किस्से दिसून आले.या काळात प्रत्येक माणूस डॉक्टर होता त्यावेळी डॉक्टर आणि माणसा मधला संवाद खूप काही सांगून गेला. छोट्या छोट्या गोष्टींमधून कसे विनोद निर्माण होतात हे सांगितले.

पितृपक्षामध्ये कावळ्याला माणूस कशी हाक मारतो याची त्यांनी नक्कल करून दाखविली. कौन बनेगा करोडपती यांच्यासोबत काम केलेले दिव्येश शिरवणकर यांनीही महिलांचा सेल्फी काढतानाचा अनुभव,होम मिनिस्टर,काय घडलं रात्री यासारख्या मालिकांच्या नावावरून कशा गंमती जमती होतात हे सांगताना महिलांनाही जोरदार हसविले. शांताबाई सोबत निळू फुले, दादा कोंडके, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सदाशिव अमरापुरकर, नाना पाटेकर, सयाजी शिंदे ,रामदास आठवले ,किरीट सोमय्या यांची मिमिक्री करून छोट्या छोट्या प्रसंगातून विनोद निर्माण केला.त्यानंतर राजकीय क्षेत्रातून शरदचंद्र पवार, अजित दादा पवार ,अण्णा हजारे ,नारायण राणे यांचा आवाज काढून उपस्थितांना त्यांच्या सभेत आपण उपस्थित आहोत की काय याची हुबेहूब मिमिक्री करून आठवण करून दिली.

याच कार्यक्रमात सोनी टीव्हीवरील कुछ भी करेगा या कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकार राजदीप कदम यांनी तर अक्षर:शा प्रेक्षकांना डोक्यावर सभागृहाची वाहवा मिळवली.आपण प्रत्यक्षात लग्न सोहळ्यात आहोत अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती विनोदातून केली. ज्यावेळी एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते.त्यावेळी आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील दृश्य आणि नवरा मुलगा यांच्या चेहऱ्यावरील दृश्य हुबेहूब वर्णन करत सर्वांच्या डोळ्यासमोर विवाह प्रसंगाची चित्र उभे केले. वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्षांचे आवाज काढत प्रेक्षकांना मनमुराद हसविले.या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी, नीलकंठ कापसे, महेश कापसे ,प्रशांत लोकापुरे,गुरु वठारे, चंद्रकांत दसले, लिंगराज कोटनूर आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर जगताप यांनी केले तर आभार बापुजी निंबाळकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!