मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार असून यानिमित्त मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान नेमकं काय बोलणार? आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याकडे लक्ष लागले आहे.
यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मनसे सैनिकांची गर्दी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
तसेच सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा होत असलेला अवमान, विधिमंडळ अधिवेशनामधील औरंगजेबाची कबर, कुणाल कामरा आणि रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी या विषयावर ते काय भाष्य करणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी काही महत्त्वाच्या पदांवर राज ठाकरेंकडूनन काही नेत्यांच्या नेमणूक करण्यात आली होती. ज्यात मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईणकर आणि मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले असून जे पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवतील.