---Advertisement---

राष्ट्रधर्म वाढवू या ; मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !

By team
On: March 30, 2025 9:51 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आज मराठी नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यात येत असून आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेछ्या दिल्या आहे. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

नूतन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात आणि उद्योजकता, व्यापार – उदीम अशा सर्वच क्षेत्रात नवचैतन्य, ऊर्जा घेऊन येवो. सर्वांकरिता सुख- समृद्धी, समाधान आणि भरभराटीचे क्षण घेऊन येवो, अशी मनोकामना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी खंडप्राय भारतवर्षाचे वैभव वृद्धिंगत करण्याचा कळसाध्याय रचला. त्यांच्याकडून प्रखर राष्ट्रभक्ती- स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळाली. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र आज शेती- सिंचन, शिक्षण–आरोग्य, उद्योग–गुंतवणूक, ऊर्जा–तंत्रज्ञान यांसह सामाजिक न्याय, महिला सबलीकरण तसेच साहित्य- कला- क्रीडा आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर आहे. या वाटचालीत अनेक थोरांचे, धुरिणांचे योगदान आहे. त्यांनी दिलेला हा राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊनच आपल्याला विकसित भारताचे स्वप्न–संकल्प साकार करण्यात विकसित महाराष्ट्र म्हणून वाटा उचलायचा आहे.

त्यासाठी आपल्याला एकजूट आणि निर्धार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे नववर्ष निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विकासाच्या संकल्पना, सामाजिक न्यायाच्या योजना, पायाभूत सुविधांचे महत्वकांक्षी प्रकल्प साकारण्यासाची ऊर्जा घेऊन येईल अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील तरूणांच्या उद्योग–व्यवसायातील नवसंकल्पना, शिक्षण–तंत्रज्ञान आणि संशोधनांच्या पंखात भरारीचे बळ लाभावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. हे नववर्ष नागरिकांच्या जीवनात धनधान्य, पशुधनाची समृध्दी आणि भरभराट घेऊन येवो, निसर्गाची कृपा घेऊन येवो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!