मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या दोन शिवसेनेत चांगलेच राजकारण तापले असतांना नुकतेच दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका चर्चा सत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटातील नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली आहे.
अंधेरी येथील जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नीलम गोऱ्हे हे दिल्लीच्या व्यासपीठांवरुन एक वाक्य बोलल्या आता ते व्यासपीठ बरोबर होते की चुकीचे होते हा भाग वेगळा. परंतु ते काही जणांना एवढे झोंबले की मिरच्या लागल्या. हा एकनाथ शिंदे त्यांना पुरुन उरला होता. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले, त्यामुळे त्यांना मिरची लागली. नीलम गोऱ्हेंच्या आधीही अनेक लोक हे बोलले आहेत.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ना खोके नाही कंटेनर लागतात, असे राज ठाकरे बोलले होते. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे असे अनेकजण बोललेत. हे काही नवीन नाही. पण नीलम ताई बोलल्यानंतर त्यांच्या मागे इतके लागले, त्यांना इतक्या मिरच्या लागल्या, पण नीलम ताईंवर इतक्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणे, आरोप करणे त्यांना शोभत नाही. त्या खरे बोलल्या. काहीही खोटे बोलल्या नाहीत. आम्ही देना बँक आहोत आणि समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे.
नीलम गोऱ्हे या महिलांवर अत्याचार झाला किंवा इतर काहीही झाले तर त्या पहिल्या धावून जायच्या, तेव्हा नीलम ताई चांगल्या होत्या. आताही शक्ती विधेयकात त्यांचे मोठे योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्या काम करतात. हीच पोट दु:खी आहे. ती पोट:दुखी थांबत नाही, कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाहीत, कंपांऊडरकडून औषध घेतात, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.