ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणूक आयोगाला प्रणिती शिंदेंचे पत्र : ‘ही’ केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रतिवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच प्रणिती शिंदे यांनी हे पत्र लिहीत विनंती केली आहे.

प्रणिती शिंदे यांचे पत्र काय?
प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ”यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना पायपीट करावी लागत आहे. शेतीसाठी दूरचीच गोष्ट, पण जनावरांसाठी पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे. यासाठी प्रतिवर्षी पाणी टंचाईच्या काळात अनेक सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, समाजातील दानशूर व्यक्ती ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवण्याची सोय करत असतात. शासकीय स्तरावरही काही प्रमाणात पाण्याची सोय केली जाते. मात्र आत्ता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता सुरु असल्याने अनेकांना पाणी पुरवठा करण्याच्या या समाजपयोगी कामात आचारसंहितेमुळे अडथळे येण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेची पाण्याअभावी समस्या निर्माण होऊ नये यासाठी ज्या ज्या सामाजिक संस्था संघटनांकडून गावोगावी पाणीपुरवठा केला जातो, अशा संस्था संघटनांना पाणी वाटप करण्यास आचारसंहितेमधून मुभा मिळावी. जेणेकरून ग्रामीण भागातील पाण्याची टंचाईची भेडसावणार नाही. तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!