मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारसभांचा धडाका आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरे बंधूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते सध्याच्या राजकीय परिस्थितीपर्यंत अनेक मुद्द्यांवर खळबळजनक विधानं केली.
मुंबईतील मोक्याच्या जमिनी एका विशिष्ट उद्योगपतीला दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव आणि राज ठाकरे यांनी सत्ताधारी गटावर घणाघात करताना म्हटले की, महाराष्ट्रातील सत्ताधारी हे केवळ “ससाणे” असून दिल्लीच्या आदेशावरून राज्यातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. राज ठाकरे यांनी सत्ताधारी राजकारण्यांची तुलना थेट ससाण्यांशी करत, “मालकाच्या हातावर बसून शिकार करून आणणं हे ससाण्याचं काम असतं, तसंच आज सत्तेत बसलेले लोक दिल्लीतील मालकांच्या हातावर बसून आपल्याच माणसांना फोडत आहेत,” असा घणाघाती टोला लगावला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी वाढत्या स्थलांतरावर चिंता व्यक्त करताना, उत्तरेतून दररोज सुमारे ५६ ट्रेन महाराष्ट्रात येत असल्याचा दावा केला. ठाणे जिल्ह्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, ८-९ महानगरपालिका असलेला हा जगातील एकमेव जिल्हा आहे. ही वाढती लोकसंख्या केवळ रोजगारासाठी नसून राजकीय वर्चस्वासाठी येत असल्याचा आरोप करत, “मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करणार,” अशी भाषा वापरण्यापर्यंत मजल गेली आहे, ही धोक्याची घंटा असल्याचे राज ठाकरे म्हणाले.