नांदेड : वृत्तसंस्था
मराठवाड्यातील जनतेने अनेक वर्षे काँग्रेसला साथ दिली, तरीही या पक्षाने व तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी सत्ता उपभोगूनही मराठवाड्याला विकासापासून दूर ठेवले. त्यामुळे आता आम्ही मराठवाडा विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार असून जनतेने भक्कम साथ द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नांदेड लोकसभेचे भाजप- महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ ग्राऊंड असर्जन रोड कौठा येथे शनिवारी सकाळी दहा वाजता झालेल्या प्रचंड जाहीरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित हजारो जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस, इंडिया आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. देशाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची याचा विचार देशभरातील सुज्ञ जनतेला करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसला जनाधार राहिलेला नाही.