अक्कलकोट : येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांबद्दल व भाविकांना स्वामी समर्थांनी दिलेल्या प्रचितीबद्दल आजपर्यंत आपण ऐकून होतो. या प्रचितीमुळे आपल्याही मनी स्वामी समर्थांबद्दल कुतूहल निर्माण झाला.
मन न कळत नित्यपणे स्वामींचे स्मरण करू लागले. गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकोटला येऊन प्रत्यक्ष स्वामी दर्शन घेण्याची इच्छा होती, परंतु स्वामींची आज्ञा नसल्याने स्वामींच्या इच्छे शिवाय माझी इच्छा कशी पूर्ण होणार ? आज प्रत्यक्षात स्वामींच्या इच्छेनुसार येथे येऊन त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण झाल्याने मन गहिवरले असल्याचे मनोगत प्रसिद्ध मराठी सिनेकलाकार मकरंद अनासपूरे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मकरंद अनासपूरेंचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनासपूरे बोलत होते.
पुढे बोलताना अनासपूरे यांनी वटवृक्ष मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वामींकडे पाहिल्यानंतर दयाभाव, भक्ती व करुणा अंतकरणात अंगीकरून जीवन वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली, कारण स्वामी म्हणजे दयाभाव, भक्ती व करुणेचे मूर्त स्वरूप असल्याचे मनोगतही अनासपूरे यांनी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संतोष जमगे, गिरीश पवार, विक्रम जाधव, रवि मलवे, संजय पवार, गिरीश पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.










