अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी गावातील जत्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मढी ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे समर्थन केले आहे. मढी गावाने घेतलेला निर्णय इतिहासात लिहिला जाईल. या गावाने जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले, असे ते म्हणाले. हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशाराही नीतेश राणे यांनी दिला. ते मढी गावात हिंदू धर्म सभेत बोलत होते.
पुढील महिन्यापासून मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये यंदा मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालावी, असा ठराव ग्रामसभेने संमत केला. यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून यापूर्वी यात्रेकडे बघितले जात होते. या ठरावामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. गटविकास अधिकार्यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुस्लीम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
मढी गावाने घेतलेला निर्णय इतिहासात लिहिला जाईल, जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मढी गावाने केले. मढी गावातील कडवट विचाराचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे, अशा शब्दात मंत्री राणे यांनी मढी गावच्या ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावाचे समर्थन केले. गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असेही ते म्हणाले. आम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्हाला चालेल का?, रामगिरी महाराजांनी जर एखादी भूमिका घेतली तर तुम्हाला मिर्चा का झोंबतात? असा सवालही नीतेश राणे यांनी उपस्थित केला.
हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, असे आव्हान राणे यांनी दिले. आम्ही आमदार, मंत्री झालो ते हिंदू जनतेने मतदान केले म्हणून झालो. आता मोर्चे काढण्याची, आंदोलनांची गरज नाही. ते दिवस गेले, आता सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी विशिष्ट समाजाला उद्देशून भाष्य केले.