अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री,मुंबईच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरावरील ग्रामीण पत्रकारितेतील २०२४ -२०२५ यावर्षीचा द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर झाला आहे.येत्या रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजता मुंबईतील अंधेरी पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हॉटेल आयटीसी मराठा येथे एका विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय भिडे यांनी ही माहिती दिली.
ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यावर्षी आपला रौप्य महोत्सव साजरा करत आहे.त्यामुळे राज्यातील विविध मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहेत.पत्रकार मारुती बावडे यांनी ग्रामीण पत्रकारितेच्या क्षेत्रात मागच्या वीस वर्षांमध्ये उल्लेखनीय असे कार्य केले आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेबरोबरच तळागळातील वंचितांचे प्रश्न समजून घेऊन ग्रामीण भागामध्ये सातत्याने अमुलाग्र बदल घडविण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केला आहे.यापूर्वीही त्यांना जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विविध संस्थेचे पुरस्कार मिळाले आहेत.याची दखल घेऊनच संस्थेने या पुरस्कारासाठी निवड केली आहे.या संस्थेच्या पुरस्काराला विशेष महत्व आहे.पत्रकारिता क्षेत्रातून यापूर्वी जेष्ठ पत्रकार कुमार केतकर,डॉ.उदय निरगुडकर, प्रकाश कुलकर्णी,दिनकर गांगल आदींना हे पुरस्कार मिळाले आहेत.ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री गेल्या १९ वर्षांपासून पुरस्कार विजेत्यांची निवड करत असते.यासाठी विविध क्षेत्रातून गुणवत्ता आणि कार्य हा एकच निकष आहे,असे डॉ.भिडे यांनी सांगितले.यावर्षी बावडे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.