मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचा साला आहे, कोणाचा नातेवाईक आहे, याच्यावर कारवाई होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते. या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणे घेणे नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही.
पुढे मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.