ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू !

सातारा : वृत्तसंस्था

सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बु. येथे  माती नालाबांधमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या शाळकरी भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हिवरे ता. कोरेगाव येथे घडली. ऋतुराज रोहिदास गुजले वय (१४) व वेदांत रोहिदास गुजले वय (१२) असे मृत मुलांचे नाव आहे.

 

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज गुजले हा इयत्ता ८ वीमध्ये तर वेदांत गुजले हा इयत्ता ६ वी मध्ये शिकत होता. रविवार दि. ३ डिसेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने त्यांची आई दोघा मुलांना शेतामध्ये घेऊन गेली. आईचे खुरपणीचे काम चालले होते. या वेळी दोघे भावंडे शिवारात जनावरे चारत होती. दुपारनंतर हे दोघे शेताजवळ असलेल्या नाईक इनामदार शिवारातील माती नालाबांधात पोहण्यासाठी गेली. ऋतुराज यास पोहण्यास येत होते. मात्र, वेदांत यास पोहण्यास येत नव्हते. सायंकाळी पाच वाजता त्यांची आई त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी माती नालाबांधा जवळ गेली असता तिला बांधाजवळ दोघांची कपडे दिसली.

 

मात्र, दोघे मुले दिसून आली नाहीत. दरम्यान, गावातील तरुणांनी पाण्यात शोध घेतला असता पाण्यामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची फिर्याद नीलेश महादेव गुजले यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली असून, तपास पोलीस हवालदार उदय जाधव करीत आहेत. रोहिदास गुजले हे मोलमजुरी, तसेच रोजंदारी करूनच आपला उदरनिर्वाह करीत असे. त्यांना दोनच मुले थोरला मुलगा ऋतुराज व धाकटा वेदांत दोघेही शिक्षण घेत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!