मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांची तातडीने कर्जमुक्ती आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी केली. यास नकार दिल्यास मराठवाड्यासह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
पक्षातील फुटीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेकांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. काहींना पळवले, पण ते पितळ होते, सोनं माझ्याकडेच आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी ‘भगवी शाल पांघरलेले गाढव’ अशी खरमरीत टीका केली. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ओला दुष्काळ’ ही संज्ञा नाकारली होती, यावर ठाकरे म्हणाले, “निकष खड्ड्यात घाला आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा.” आपल्या कार्यकाळातील कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची योजना गद्दारांमुळे अपूर्ण राहिल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट सवाल केला. “संघाच्या मेहनतीला लागलेली विषारी फळे (भाजपचे राजकारण) तुम्हाला मान्य आहेत का? मोहन भागवत मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटी घेतात, त्यांना हिंदुत्व सोडले असे म्हणण्याची हिंमत भाजपमध्ये आहे का?” असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.