सोलापूर दि.५ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे.
अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वास्तव करुन चितमपल्ली हे नुकतेच सोलापूर या मायभूमीत कायमच्या वास्तव्यासाठी परतले आहेत. त्यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान मोलाचे आहे. २००६ साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचा महापालिकेने मानपत्र देऊन नागरी सत्कार करावा अशा मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने महापौर श्रीकांचना यन्नम यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, मसाप जुळे सोलापुरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रशांत जोशी,कार्यवाह गिरीष दुनाखे उपस्थित होते.
५ नोव्हेंबर रोजी मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस आहे. त्तेयानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या १२ नौव्हेंबर रोजी मारुती चितमपल्ली यांना भेटून त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येईल, असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले.
मसापच्या मागणीप्रमाणे चितमपल्ली यांना मानपत्र प्रदान करण्याचा निर्णय सभागृहात घेतला जाईल. त्यासाठी आवश्यक असलेला ठराव नोव्हेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुर करुन घेतला जाईल. सध्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे मानपत्र प्रदान सोहळा मसाप जुळे सोलापुरच्या मदतीने आचारसंहिता संपल्यानंतर घेण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
– स्मृतीवनला रायते यांचे नाव
विजापूर रोडवरील स्मृती वनाला दिवंगत डॉ. वासुदेव रायते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी मसापच्यावतीने करण्यात आली. स्मृती वन उभारणीत डॉ. रायते यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचेच नाव स्मृती वनला देणे उचित असल्याचे पद्माकर कुलकर्णी यांनी सांगितले आणि ते महापौरांनी मान्य केले. याबाबतचा ठराव सभागृहात मंजुर करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही महापौरांनी यावेळी दिली.