हिंगणघाट (वर्धा) : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश संपूर्ण जगात विकसित भारत म्हणून ओळखला जात असून विकसित भारतासाठी महाराष्ट्रानेही योगदान द्यावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंगणघाट येथे केले.
येथील टाका मैदानावर सोमवार, ८ एप्रिल रोजी योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आज देशातील विरोधी पक्षाजवळ विश्वसनीय नेता नाही, नीती नाही व नियतही नाही. स्पष्ट नीती असलेला एकमेव नेता म्हणजे नरेंद्र मोदी हेच असून एक विशिष्ट उद्देश घेऊन ते नियतीने देशाच्या विकासासाठी कार्यरत असून पुन्हा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. योगी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तालुक्यातील आराध्य संत श्री भोजाजी महाराज यांचे स्मरण करून केले.