सोलापूर, वृत्तसंस्था
रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी १६ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९५ हजार १२४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून, या विम्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित झाली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात यंदा ४ लाख १३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. साधारण ८९.७४ टक्के इतकी पेरणी झाली आहे. पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अलीकडच्या काही वर्षांत जनजागृती होत आहे. त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. विम्यासाठी आता हप्ताही केवळ एक रुपया असल्यानेही त्याला प्रतिसाद मिळत आहे.
या हंगामातील विम्यासाठी १५ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. पण त्यानंतर ती एकदिवसाने वाढवून १६ डिसेंबरपर्यंत केली होती. या दिवसअखेर जिल्ह्यात ९५ हजार १२४ शेतकऱ्यांनी १ लाख ४३ हजार ८६० हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा उतरला आहे.