नवी दिल्ली : देशात प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची एक प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयात विविध रुपाने विद्यमान आहे. हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे, असे प्रतिपादन आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी ‘मेकिंग ऑफ ए हिंदू पेट्रियॉट- बैकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केले.
माझी देशभक्ती माझ्या धर्मातून आली आहे, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यामुळे ‘हिंदू देशभक्त’ हा शब्द म्हणजे ‘वदतो व्याघात्’ असा प्रकार असल्याचे भागवत यांनी नमूद केले. सामाजिक समीक्षण केंद्रातर्फे हर आनंद प्रकाशनाच्या सहकार्याने हा शोधग्रंथ तयार करण्यात आला आहे. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री प्रल्हाद पटेल उपस्थित होते.
देशभक्त ही संज्ञा मोजक्या लोकांसाठी वापरायची, असे आम्ही कधीही मानले नाही. देशात प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयामध्ये विद्यमान आहे. पण महात्मा गांधी जे म्हणाले, ते विचार करण्यासारखे आहे ‘माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे. त्यामुळे हिंदू आहे म्हणजे तो आपोआप देशभक्त आहेच, त्याला ते असायलाच हवे’ असे गांधीजी म्हणायचे.
स्वातंत्र्य लढा हा दोन संस्कृतींमधील संघर्ष म्हणजे पाश्चात्त्य संस्कृती विरुद्ध भारतीय संस्कृती असा लढा होता. भारतीय संस्कृतीच्या पुनर्निमाणाचा तो लढा होता, त्यासाठी भारतीयांना स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवावा, असे गांधीजींचे स्पष्ट मत होते. आपण धर्मभ्रष्ट झालो, म्हणून पारतंत्र्यात पडलो, असेही गांधीजी म्हणायचे. विशेष म्हणजे डॉ. हेडगेवारांचाही अगदी तसाच विचार होता, असेही भागवत यांनी सांगितले.