ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन-तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची होती संधी ; माजी मंत्री भुजबळ यांचे वक्तव्य !

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केल्यानंतर आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे.

माझ्या आयुष्यात दोन-तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती, पण योग्य वेळ निघून गेली. काँग्रेस सोडताना मला थांबवून मुख्यमंत्री करण्याचीही ऑफर मिळाली होती. तरी मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो. सगळ्यांनी इच्छा धरायला हरकत नाही, राजकारणात मेहनत करा, योग्य वेळ येते असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकार, राज्य प्रशासन आणि राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. जातीगणनेपासून ते जिल्हा बँक, मुख्यमंत्री पदाच्या संधी, शरद पवार यांच्या टीकेपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी परखड मत व्यक्त करत सरकार आणि अधिकार्‍यांना सजगतेचा इशारा दिला.

भुजबळ म्हणाले, महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणनेसाठी रॅली केल्या. स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा जनगणना झाली, पण जातीवार माहिती गोळा करण्यात आली नाही. ओबीसी समाज ५२ टक्के असूनदेखील फक्त २७ टक्के आरक्षण मिळाले. कोर्टात वारंवार ’त्यांची संख्या किती’ असा प्रश्न विचारला जातो, म्हणून ही जनगणना अत्यावश्यक होती.

नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. यामुळे निवडणुका लांबतील, असे त्यांना वाटत नाही असेही ते म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर केलेल्या टिकेबाबत ते म्हणाले, शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य राजकारणात गेले आहे. ते संरक्षण मंत्री होते, त्यांना काय बोलायचे ते माहीत आहे. सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा अर्थ सैन्याच्या मागे उभं राहणं असतो, असा स्पष्ट संदेश भुजबळांनी दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!