अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
समर्थ नगर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ विसावा कट्टा येथे वटपौर्णिमेच्या औचित्याने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या कुमारी पूनम मोहन चव्हाण हिचा तसेच ३६ वर्षे शिक्षणक्षेत्रात सेवा देणारे सेवानिवृत्त शिक्षक विद्याधर गुरव यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात भाजपचे माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मोहन चव्हाण, श्रीकांत जिड्डीमनी, धुळप्पा बजे, राचप्पा वागदरे, मल्लम्मा पसारे, शरणप्पा ढोणसाले, सुरेश पिरगुंडे,रमेश येणेगुरे,बसवराज नालवार,सुधाकर काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना विद्याधर गुरव यांनी शिक्षकी जीवनातील अनुभव शेअर करत विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा व समाजासाठी शिक्षकाची भूमिका अधोरेखित केली. तर कुमारी पूनम चव्हाण हिने आपल्या मनोगतात सांगितले की,स्पर्धा परीक्षा म्हणजे संयमाची परीक्षा आहे. आई-वडिलांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादन करू शकले.
कार्यक्रमाच्या धार्मिक पार्श्वभूमीत रामकृष्ण हरी भजनी मंडळ, अक्कलकोट यांच्यातर्फे सुमधुर भजनसेवा सादर करण्यात आली. त्यानंतर हासापूर येथील स्वामीभक्त स्वामीनाथ बेंद्रे परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ समर्थ नगर आणि परिसरातील अनेक भाविकांनी घेतला. विसावा कट्ट्याच्यावतीने अशा उपक्रमातून स्वामी भक्ती, समाजसेवा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा गौरव करून सकारात्मक समाजनिर्मितीची वाटचाल सुरू असल्याचे
मत यावेळी व्यक्त करण्यात आले.