ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ३२ हजार शेतकऱ्यांना बसला फटका !

सोलापूर : वृत्तसंस्था

नुकतेच मे महिन्यात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले असून, यात जिल्ह्यातील 32 हजार 415 शेतकर्‍यांना फटका बसला आहे. नुकसानाचा पंचनामा करुन तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.

अवकाळी पावसामुळे 21 हजार 971 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात 64 कोटी 38 लाख 72 हजार रुपये मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दरवर्षी जून पंधरवडा ओलांडल्यानंतर पाऊस पडत असतो. यंदा मात्र 10 मेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. कृत्तिका नक्षत्रातील पाऊस सहसा कोरडा जातो. मागील अनेक दशकानंतर पहिल्यादांच कृत्तिका नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर रोहिणी चांगल्या बरसल्या. मे महिन्यात साधारण 272 मिमी इतका विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अवेळी पडलेल्या जोरदार पावसामुळे आंबा, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला, पेरू यासारख्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले होते.

कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 11 तालुक्यात पंचनामे करण्यात आले. त्यात सर्वाधिक नुकसान करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यात झाल्याचे पंचनामा अहवालातून स्पष्ट झाले आहे. शासनाकडे भरपाईची रक्कम वितरीत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!