ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चमत्कार दाखवा आणि 21 लाख जिंका ; अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था

चमत्कार दाखवा आणि 21 लाख जिंका, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. देव धर्माच्या नावाखाली चमत्कार करणाऱ्या बाबा-बुवा तसेच मांत्रिकांकडून होणाऱ्या फसवणुकीला तसेच बुवाबाजीला आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान दिले आहे. सुरुवातीला ही रक्कम 5 लाख होती, नंतर 10 लाख, 15 लाख व आता 21 लाखांवर पोहोचली आहे. पण आजपर्यंत कोणीही हे आव्हान स्वीकारले नाही, असे अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.

संजय बनसोडे यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्ष पदावर निवड झाली आहे. याचे औचित्य साधत ठाणे येथे पुरोगामी संघटनांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बुवा-बाबां-मांत्रिकांकडून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, बुवाबाजीला सुरुंग लावण्यासाठी चमत्कार करण्याचा दावा करणाऱ्यास, चमत्कार दाखवा आणि 1 लाख जिंका असे सुरुवातीला आव्हान दिले होते. त्यानंतर या रकमेत वाढ होत गेली, मात्र कोणीही चमत्कार दाखवण्यासाठी पुढे आले नाही, असे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार प्रसार, संत परंपरेचा वारसा व भारतीय सण, उत्सवाची चिकित्सा करण्यात आली. यावेळी संजय बनसोडे म्हणाले, दिवाळीत 500 रुपयांचे फटाके वाजवण्यापेक्षा 200 रुपयांचे फटाके वाजवून 300 रुपयांची पुस्तके खरेदी करा. नंतर दिवाळी हा दिव्यांचा सण आहे त्यामुळे कोणत्याच सणाला फटाके वाजवू नका. सर्व जातीच्या जात पंचायतीला विरोध केला पण अद्याप राजकीय पाठिंब्यामुळे बुवाबाजी टिकून असल्याचे मत बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या केंद्रीय सदस्या सुशीला मुंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ठाणे शहर सचिव अशोक मोहिते यांनी केले. अशोक मोहिते म्हणाले, जगत चमत्कार नसतातच, हातचलाखी व विद्यान-तंत्रज्ञानाशिवाय चमत्कार करताच येत नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कारच्या विरोधात, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात गेल्या 36 वर्षात केलेल्या अविरत कामामुळे आता उघडपणे चमत्कार करण्याचा दावा करणारे चमत्कारी भाषा करणारे बुवा, बाबा मांत्रिक शोधून सापडणार नाहीत, याचे संपूर्ण श्रेय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जाते.

या कार्यक्रमाच्या विचारपिठावर, प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनएपीएम’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय मं.गो., कामगार नेते व विचारवंत राजन राजे,’यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चे विश्वस्त दत्ता बाळसराफ, अध्यक्षस्थानी प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, महा.अंनिसच्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!