सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. ७ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या या निर्बंधांनुसार, बँकेला कोणतेही नवे कर्ज, ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.बँकेच्या PhonePe, ATM आणि इतर सर्व व्यवहार सेवा तत्काळ थांबल्या असून खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
आरबीआयने सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही ठोस सुधारणा झाल्या नाहीत, त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी हे पाऊल उचलावे लागले. ठेवीदारांना ₹५ लाखांपर्यंत ठेव विमा (DICGC) योजनेअंतर्गत संरक्षण मिळेल. अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी बँकेशी किंवा www.dicgc.org.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आरबीआयने म्हटले आहे. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहतील आणि या कालावधीत आरबीआय बँकेची स्थिती सतत तपासणार आहे.
