इराण-इस्रायल तणावाचा शिर्डीवर परिणाम; गॅस टंचाईमुळे साई संस्थानचा प्रसाद वितरणात मोठा बदल !
लाडू तयार करण्यासाठी लागणारा गॅस फक्त १०-१२ दिवस पुरेल; प्रत्येक भाविकाला आता एकच लाडू पाकीट
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीचे पडसाद आता देशातील धार्मिक स्थळांवरही उमटू लागले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतही गॅस टंचाईचा फटका बसला असून साईबाबा संस्थानने प्रसाद वितरणात महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिर्डीत दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात लाडू प्रसाद तयार केला जातो. मात्र सध्या गॅस साठा मर्यादित असल्यामुळे इंधन बचतीसाठी संस्थानने प्रसाद वितरणाच्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट दिले जाणार आहे. हा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे.
साई संस्थानच्या माहितीनुसार, दररोज सुमारे ४५ हजार लाडू प्रसाद पाकीटांची विक्री केली जाते. याशिवाय दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना सुमारे ५० हजार बुंदी प्रसाद पाकीटांचे मोफत वितरण केले जाते. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर करावा लागतो. सध्या गॅसचा पुरवठा कमी झाल्याने प्रसाद निर्मितीवर मर्यादा आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
संस्थानकडे सध्या लाडू बनवण्यासाठी लागणारा गॅस साठा केवळ दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच उरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपलब्ध गॅस साठा अधिक काळ टिकवण्यासाठी वापरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे भाविकांना मिळणाऱ्या प्रसादाचे प्रमाण कमी झाले असले तरी संस्थानकडून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, प्रसाद निर्मिती कमी झाल्यामुळे संस्थानला आर्थिक फटका बसण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर प्रसाद वितरण पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.