श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमारेषेवर दहशतवादी कुरापती सुरुच आहे. आज शुक्रवारी 19 रोजी सकाळीही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दुदैवी म्हणजे दुसरीकडे बडगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीरचे एसपीओ शहीद झाले आहेत.
शोेपियानमध्ये परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
बडगाम जिल्ह्यातील बीरवाहमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीर पोलीसचे एसपोओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले आहेत. आणखी एक-दोन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.