मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरूनच एक वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी. सारखं फुकटात कसं चालणार? असा सवाल त्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेतकरी कर्जमाफीचे सर्व टप्पे राज्य सरकारने निश्चित केले आहेत. कर्जमाफी कशी करायची आणि शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठीच्या दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे. एप्रिल महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर तीन महिन्यांत म्हणजेच ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.