मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे खाते अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच खाते अदलाबदलीचा निर्णय होऊ शकतो. मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्र्यांच्या विधानामुळे सरकारमध्ये देखील नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
गेल्या काही महिन्यांमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची सततची वादग्रस्त विधानांमुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी राज्यात केली जात आहे. ठिकठिकाणी तसा रोज नागरिकांनी व्यक्त केला. सरकारमधील आणखी काही मंत्र्यांवरही लोकांनी रोष व्यक्त केला आहे. या परिस्थितीत काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.