ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री ॲक्टिव्ह मोडवर : प्रशासनाला दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा कहर सुरु असतांना आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरु ठेवून याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच प्रशासनाची बैठक घेतली होती तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही परभणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थितीची पाहणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस होत आहे.‎ गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 39 टक्के अधिक‎ पाऊस झाला आहे. राज्यातील सर्व महसूली ‎विभागांनी आतापर्यंत पावसाची सरासरी ओलांडली ‎असून सर्वाधिक 131.8 टक्के पाऊस मराठवाडा ‎विभागामध्ये झाला आहे. दुष्काळी प्रदेश म्हणून ‎ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा, गतवर्षीच्या तुलनेत दीडपटी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.‎ गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाचे‎ सातत्य आहे. या हंगामात वार्षिक सरासरीमध्ये‎ आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद मराठवाडा‎ विभागात झाली आहे. त्या खालोखाल अमरावती‎ विभागाची व त्यानंतर नागपूर विभागात पावसाने‎ दमदार हजेरी लावली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ॲक्टिव्ह मोडवर : तातडीच्या उपाय-योजना करण्याच्या प्रशासनाला सूचना, तातडीने मतद देण्याचा प्रयत्न

आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना.
गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान; नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याच्या सूचना.
पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती पंचनाम्यात घेण्यात येणार.
अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्यांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत देण्याच्या सूचना.
विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन आदी सर्वांनी समन्ययाने कामकाज करण्याचे निर्देश.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरु ठेवून याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण, स्थलांतर केलेल्यांचे तात्पुरते निवारे उभे करणे, कपडे, अन्न, शुद्ध पाणी, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश.
पाटबंधारे विभाग, हवामान खाते यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना वेळोवेळी आवश्यक माहिती त्वरित द्यावी; आपदग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करण्याच्या सूचना.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने निर्णय घेण्याचे आदेश.
पाऊस परिस्थिती, बाधित क्षेत्र, धरणांमधील पाणी पातळी, स्थलांतरित लोकांची संख्या, झालेल्या नुकसानीची माहिती याबाबत वेळोवेळी सादर करण्याच्या सूचना.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!