---Advertisement---

शिंदेंच्या खासदाराचे वादग्रस्त विधान : जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानातून आणले !

By team
On: April 24, 2025 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम सध्या सुरू असून यावर म्हस्के यांनी असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाची एक टीमही तिथे पोहोचली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही काश्मीरमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली आहे. परंतु, याच्या बढाया नरेश म्हस्के यांनी मारल्या आहेत.

पत्रकारांशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमचे पथक काश्मीरला पाठवले. एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कोल्हापूर, केरळ, इशाळवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे सर्वात आधी पोहोचून मदत करत होते. सरकार तर मदत करत आहे. जे लोक कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले आहे.

पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, 45 लोक रेल्वेने पहलगामला गेले होते. गरीब लोक, त्यांच्या खाण्याचे वांदे होते. सीआरपीएफच्या कँपमध्ये ते लोक राहत होते. त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी विमानतळावर आणले. ती लोक पहिल्यांदाच विमानात बसली आहेत. रेल्वेने गेलेली लोक ते घाबरलेली आहेत, पहिल्यांदा विमानात बसलेत, अशा बढाया त्यांनी मारल्या आहेत. नरेश म्हस्के यांचे हे विधान वादग्रस्त ठरत असून त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान काल पहाटे साडे तीन वाजता मुंबईत उतरले. तर आज दुपारी दोन वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले. या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्याना आश्वस्त करून मुंबईकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!