मुंबई :वृत्तसंस्था
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा खोटा प्रचार करून केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “काँग्रेस आणि यूपीए सरकारने निवडणुकीत अल्पसंख्यक मतांसाठी हिंदू आणि भगवा दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह तयार केला. त्यांनी केवळ काही व्यक्तींवरच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजावर दहशतवादाचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला. आज न्यायालयाने सातही आरोपी निर्दोष ठरवले आणि हे षडयंत्र उघड झाले आहे. काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणासाठी देशवासीयांची आणि हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे.”
मालेगावमधील भिकू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी एका दुचाकीवर स्फोट झाला होता. या भीषण घटनेत 6 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 90 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी व सुधाकर धर द्विवेदी या सात आरोपींना अटक करण्यात आली होती. विशेष एनआयए कोर्टाने गुरुवारी या खटल्याचा निकाल देत सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष घोषित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावरही टीका केली. त्यांनी म्हटले, “ज्यावेळी या प्रकरणाचा तपास झाला, त्या वेळी राज्यात कोणाचे सरकार होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. आज उद्धव ठाकरे जे लोकांसोबत बसले आहेत, त्यांच्याच सरकारच्या पोलिसांनी तो तपास केला होता. त्यामुळे ‘स्फोट कुणी केला?’ असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी या खोट्या नरेटिव्हच्या पडझडीबद्दल समाधान व्यक्त करावे, अशी माझी अपेक्षा होती.”
पत्रकारांनी विचारलेल्या ‘राज्य सरकार याविरोधात उच्च न्यायालयात जाईल का?’ या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “हा निर्णय आम्ही बारकाईने अभ्यासू. कायदेशीर बाबी समजून घेतल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींवरून हे स्पष्ट होते की, हे एक रचलेले षडयंत्र होते.”