अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून शासकीय मूल्यांकनात वाढ झाल्यानंतर आता दस्त हाताळणी शुल्कात देखील वाढ करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे.याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. पूर्वी प्रति पानाला वीस रुपये हाताळणी शुल्क होते. आता ते दुप्पट करून चाळीस रुपये करण्यात आले आहे.नोंदणी व मुद्रांक विभागास ‘बांधा वापरा हस्तांतरण करा’
या तत्त्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करणे, संगणकीकरण अंतर्गत येणाऱ्या हार्डवेअर,सॉफ्टवेअर कंझ्यूमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात त्याचप्रमाणे स्वीय प्रपंची लेख्यातून खर्च करावयाच्या बाबींमध्ये वाढ झालेली असल्याने नोंदणी व मुद्रांक विभागातील खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागविण्याकरता शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
त्याप्रमाणे आयसरिता सॉफ्टवेअरमध्ये आवश्यकते बदल व त्याची चाचणी करून एनआयसी कडून गुरुवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मध्यंतरी कोरोना काळामध्ये मुद्रांक शुल्कमध्ये मोठी सवलत देण्यात आली होती.कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा स्थिती पूर्वपदावर आणण्यात आली. त्यानंतर दोन वर्ष शासकीय मूल्यांकनात देखील वाढ करण्यात आलेली नव्हती.यावर्षी मात्र एप्रिलपासून चार ते पाच टक्के शासकीय मूल्यांकनात वाढ झाली आहे. त्याचाही फटका आता खरेदी-विक्री करणाऱ्यांना बसला आहे.त्या पाठोपाठ पंधरा दिवसामध्ये दस्त हाताळणी शुल्कातही वाढ झाल्याने राज्याला मिळणाऱ्या महसुलातही वाढ होणार आहे. पण या निर्णयामुळे नागरिकांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसत आहे.सरकारने याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी देखील पुढे येऊ लागली आहे.