ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी रेल्वे स्टेशनचे होणार नूतनीकरण, पायाभरणी समारंभ उत्साहात

दुधनी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ४१ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत एकूण ५५३ स्टेशन्सची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ५६ तर सोलापूर विभागातील चार रेल्वे स्टेशनांचा समावेश आहे. या योजने अंतर्गत दुधनी रेल्वे स्टेशनचे नूतनीकरणाचे पायाभरणी समारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला.

यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव हे देखील दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमाद्वारे उपस्थित होते. यावेळी मंचावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, सेंट्रल रेल्वेचे अधिकारी अविनेश वर्मा, दुधनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी आतिष वाळुंज, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, अक्कलकोटचे माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, आरपीआयचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सेंट्रल रेल्वेचे अधिकारी अविनेश वर्मा यांनी सांगितले की, अमृत भारत योजने अंतर्गत दुधनी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कामाच्या संदर्भात माहिती दीली. अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून दुधनी रेल्वे स्थानकाचे रुपडे पूर्णपणे पालटणार आहे. यासाठी २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये दर्शनीय भाग, प्लॅटफॉर्म, सरता जिना, स्वच्छता गृहे, सुसज्जित प्रतीक्षा हॉल, बालगोपाळांसाठी उद्यान तयार करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत येथील विविध शाळांमध्ये चित्रकला व निंबध स्पर्धा घेण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी येथील एस. जी. परमशेट्टी हायस्कूल, मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देश भक्तिपर गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमानंतर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांनी येथे सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि काही सूचना केली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर प्रवाश्यांच्या सोयीसाठी एक प्रतीक्षा कक्ष, तिकीट खिडकी, वाहनतळ करण्यात यावे असे आवाहन डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले. यावेळी दुधनी ग्रामस्थांच्यावतीने काही रेल्वे गाड्यांना दुधनी स्थानकावर थांबा मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले. दुधनी ग्रामस्थांच्या मागणीला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामीजी यांनी प्रतिसाद देत कोल्हापूर – कलबुरगी या गाडीला दुधनी स्थानकावर त्वरित थांबा देण्याचे सूचना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. दुधनी शहर हे व्यापारी शहर आहे. महारष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांना जोडणारा एक महाद्वार म्हणून ओळखला जातो. याठिकाणाहून दोन्ही राज्यातील प्रवाशी मोठ्या संख्येने प्रवास करतात. यामध्ये विशेषतः महाविद्यालयीन तरुण – तरुणी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, कष्टकरी नागरिकांचा समवेश आहे. यामुळे कोल्हापूर – कलबुरगी या गाडीला दुधनी स्थानकावर थांबा मिळाल्यास या सर्वांना आपल्या नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी महेश पाटील, रामचंद्रप्पा बिराजदार, बसवराज परमशेट्टी, राजशेखर दोशी, बसवराज हौदे, शंकर भांजी, भीमाशंकर अंदेनी, दौलप्पा हौदे, सैदप्प झळकी, मल्लिनाथ मातोळी, अनंत कासार, काशिनाथ गाडी, रेवणप्पा माशाळ, जगन्नाथ जाधव, शेवू राठोड यांच्यासह सेंट्रल रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!