सोलापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा हा ईडीच्या त्रासाला कंटाळून आणि हतबल होऊन दिलेला आहे. ईडी मागे लागेल या भीतीपोटी चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. चव्हाण यांनी जरी काँग्रेस सोडली असली तरी आपण काँग्रेसमध्येच ठाम राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जातात. हा भाजपच्या मनाचा खेळ आहे, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील ताज्या घडामोडींवर भाष्य केले.
अलीकडे मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांच्यासारख्या बड्या भारदस्त नेत्यानेही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. भाजपचे हे षड्यंत्र आहे. ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून वारंवार केवळ विरोधी नेत्यांवर दबाव आणला जातो. एकप्रकारे ब्लॅकमेल करण्यात येते. त्यातून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावून स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.
आपल्यासह इतर काही नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा सोडल्या जातात. हे काही नवीन नाही; परंतु काँग्रेस सोडून भाजप किवा अन्य कोणत्याही सोयीच्या पक्षात जाण्याचा साधा विचारही आपल्या मनाला शिवू शकत नाही. आपल्यावर ईडी वा अन्य यंत्रणांचा दबाव येऊ शकत नाही. कारण आपण वा आपले कुटुंबीय कोणत्याही संस्थांशी वा आर्थिक व्यवहाराशी संबंधित नाहीत. आपले राजकारण ज्या मूलभूत मूल्यांवर आधारले आहे, ती केवळ काँग्रेस पक्षाची आहेत, ती भाजपकडे अजिबात नाहीत. मी काँग्रेसी जन्मले, काँग्रेसी म्हणून घडले आणि काँग्रेसी म्हणून मरेन, अशा निष्ठांचा त्यांनी पुनरुच्चार केला.