अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ८५ टक्के बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून उर्वरित १५ टक्के बिले १० ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिंदे म्हणाले,आतापर्यंत दिलेल्या ऊस बिलांचा संपूर्ण अहवाल साखर आयुक्त कार्यालय तसेच संबंधित विभागाला देण्यात आला आहे. उर्वरित रक्कम देण्यासाठी कारखान्याला बँकेकडून अर्थसहाय्य मंजूर झाले असून काही तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण रक्कम जमा केली जाईल. शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न हा आमच्यासाठी प्राधान्याचा असून अडचणीच्या काळातही आम्ही शक्य तितक्या लवकर देयके अदा करण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील हंगामात पावसाचे अस्थिर स्वरूप आणि उसाचे क्षेत्र घटल्यामुळे कारखान्याने अवघे ३ लाख १३ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले होते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून साखरेच्या भावात सतत घट होत आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे.
साखर उद्योगापुढील समस्या गंभीर आहेत. उत्पादन खर्च वाढला आहे. गाळप खर्च प्रचंड वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किंमती घसरल्यामुळे कारखान्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून निर्यात परवानग्या व अनुदान वेळेवर न मिळाल्यास तरलतेचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय पावसाचे अनियमित स्वरूप आणि दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटल्याने गाळपाचे लक्ष्य पूर्ण करणेही अवघड जाते. या सर्व परिस्थितीला तोंड देत गोकुळ शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवत बिले वेळेवर अदा केली आहेत. शेतकऱ्यांनी आता पर्यंत कारखान्याला केलेले सहकार्य महत्वाचे आहे. उर्वरित १५ टक्के रक्कमही ठरलेल्या वेळेत जमा होईल. ती आणखी लवकर कशी देता येईल यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे,
असे शिंदे यांनी स्पष्ट केले.