यंदाच्या दिवाळीत केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरांसाठी दुहेरी आनंदाची शक्यता आहे. सरकार लवकरच महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) ३ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करू शकते, ज्यामुळे सध्याचा ५५ टक्के डीए वाढून ५८ टक्क्यांवर पोहोचेल. यामुळे सुमारे १.२ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनरांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
मीडिया अहवालांनुसार, सरकार ही घोषणा दिवाळीपूर्वी करेल अशी अपेक्षा आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या खिशात अतिरिक्त रक्कम येऊन सणासुदीचा उत्साह द्विगुणित होईल. यावर्षी मार्चमध्ये २ टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर आता जुलै-डिसेंबरसाठी आणखी ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
उदाहरणार्थ, जर एखाद्या पेन्शनराला ९,००० रुपये मूळ पेन्शन आहे, तर सध्याच्या ५५ टक्के डीएवर त्याला ४,९५० रुपये महागाई भत्ता मिळतो, ज्यामुळे एकूण पेन्शन १३,९५० रुपये होते. जर डीए ५८ टक्क्यांवर गेला तर हा भत्ता ५,२२२ रुपये होईल आणि पेन्शन १४,२२२ रुपयांपर्यंत वाढेल, म्हणजे दरमहिन्याला २७० रुपयांचा थेट लाभ.
याशिवाय, १६ जानेवारी २०२५ रोजी केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. सूत्रांनुसार, दिवाळीपूर्वी आयोगाचे कार्यक्षेत्र (Terms of Reference – ToR) निश्चित होण्याची शक्यता आहे. या आयोगात सहा सदस्य असतील आणि अहवाल देण्यासाठी १५ ते १८ महिन्यांचा कालावधी ठरला असला तरी यावेळी ८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे १ जानेवारी २०२६ पासून नवीन शिफारशी लागू होऊ शकतात.
महागाई भत्त्यात वाढ आणि ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदा दिवाळी त्यांच्यासाठी खास ठरणार आहे, ज्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांना अतिरिक्त आर्थिक आधार मिळणार आहे.